जगामध्ये क्रिकेट खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये विविध प्रकारे प्राविण्य मिळवणारे देखील अनेक स्थानिक खेळाडू रत्नागिरीमध्ये आहेत. त्यातीलच एक अष्टपैलू खेळाडू अविराज गावडे. नुकत्याच पुणे येथील पार पडलेल्या आंतरमहाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत अविराजने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता ९ विकेट घेत स्वत: चाच विक्रम तोडून नव्या विक्रमाला गवसणी घातली होती.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेनेकडून येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अविराज गावडे याची क्रिकेटच्या विश्वात सातत्याने दैदीप्यमान कामगिरी सुरू आहे. त्याच्या या कर्तृत्वाची दखल राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. ”सन्मान कर्तृत्वाचा” या कार्यक्रमात उदय सामंत यांच्या हस्ते अविराजचा सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.
या आधीच्या आयआयटी हिंजवाडी महाविद्यालयाविरुद्ध सामन्यातही अविराजने दोन ओव्हरमध्ये चार रन देत ७ विकेट घेतल्या. सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची कामगिरी अविराजने केली असून, या कामगिरीची दखल घेत त्याचा सन्मान करण्यात आला. त्यासोबतच त्याने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्याचे कौतुक देखील करण्यात आले आणि भविष्यात अशाच प्रकारे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून रत्नागिरीचे नाव रोषन करावे यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.