जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या ३८० अपघातांनी १३२ जणांचे बळी गेले आहेत. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर, रत्नागिरी- कोल्हापूर राज्यमार्ग व जिल्हा अंतर्गत मार्गांवर झालेले हे अपघात आहेत. यामध्ये १२० अपघात जीवघेणे ठरले आहेत. सर्वाधिक बळी मे महिन्यात गेले असून, अपघातांची संख्या ६३ आहे. त्यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीमध्ये हे नमूद करण्यात आले आहे. तरी गतवर्षांच्या तुलनेत अपघातामध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या चौपदरीकरणाची कामे सुरू आहेत.
अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी अर्धवट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काहीसे घटले आहे. गेल्या वर्षभरात ३८० अपघात झाले असून, १३२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ३६ अपघात झाले. १५ जणांचा मृत्यू झाला. अपघातांची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वाधिक अपघात रात्री १ ते ४ या वेळेत झाले आहेत. म्हणजे झोप अनावर होऊन आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे हे अपघात झाल्याचे पुढे आले आहे. काही ठिकाणी गाडीचे टायर खराब असणे किंवा फुटणे, गाडीचे नियमित चेकअप् न करणे तसेच ब्लॅकस्पॉटवरही भरधाव वाहन चालवणे ही कारणे आहेत.
भरधाव वेग हे देखील यातील एक प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात ३ ब्लॅकस्पॉट असून ते दूर करण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, तसेच सुरक्षा समितीचे खासदार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक, आरटीओ, बांधकाम विभाग या सर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे अपघात कमी होण्यास मदत होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांबाबतचे पालन करा, असे आवाहनही वाहतूक शाखा आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.