मुंबई गोवा महामार्गावर कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह अन्य दोन वाड्यांत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत ५ बंद घरे फोडून सोन्याचादींच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा एकूण ४ लाख ४३ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे लक्ष वळविल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी उत्तररात्रीनंतर या चोऱ्या झाल्या आहेत. या चोरीच्या तपासाचे आव्हान आता राजापूर पोलीसांसमोर आहे. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या ५ पैकी अशोक महाडेश्वर यांच्या घरातील रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असून अॅड. मुरलीधर मोरे यांच्या घरातील सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. उर्वरित ३ घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. या प्रकरणी अशोक महाडेश्वर यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे.
५ घरे फोडली – राजापुर तालुक्यात कोंडये येथील शिक्षक कॉलनीसह बौध्दवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, अॅड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे यांची ५ घरे फोडून चोरट्यानी एकूण ४ लाख ४३ हजाराचा ऐवज लंपास केला. सकाळी याची माहिती ग्रामस्थांनी राजापूर पोलीसांना देताच पोलिस निरिक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे टिमसह घटनास्थळी दाखल झाले व त्यानी पंचनामा केला आहे.
बंद घरे फोडली – ‘ही सर्व घरे बंद होती. महाडेश्वर हे कणकवली तालुक्यातील आपल्या तिवरे गावाहून येऊन जाऊन असत. तर अन्य घरे बंद होती. यातील महाडेश्वर यांच्या घरातून रोख रूपये ६ हजार व सोन्याचे दागीने यामध्ये १५ ग्रॅम वजनाची आईच्या गळ्यातील सोन्याची मण्याची माळ, २४ ग्रॅमचा गळ्यातील सोन्याचा हार, १२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २ सोन्याचे कॉईन प्रत्येकी वजन ५ ग्रॅम, २ ग्रॅम सोन्याचा १ कॉइन, ३ सोन्याचे कॉईन प्रत्येकी ३ ग्रॅम वजन, ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोल आकाराच्या रिंगा, ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे रिंग, सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याची कुडी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, सुमारे ५ ग्राम वजनाची चंद्राची पैजण असा सुमारे ३ लाख ९३ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
चांदीच्या मूर्ती लांबविल्या – तसेच अॅड. मुरलीधर मोरे यांच्या बंद असलेल्या घरात प्रवेश करुन चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीच्या ४ चांदीच्या मूर्ती व रोख रक्कम १० हजार असा एकूण रक्कम ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. तर योगेश सुरेश मोरे, अविनाश तावडे व शशिकांत लाड यांची बंद घरे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र या ३ घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. या प्रकरणी अशोक महाडेश्वर यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. आपले दागिने व रोख रक्मम अशी एकूण ३,९३,०००/-रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेलेली आहे. तसेच शेजारी राहणारे मुरलीधर मोरे यांचे बंद स्थितीत असलेल्या घरातून ४० हजारांच्या ४ चांदीच्या मूर्ती व १० हजार रूपये असा ५० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्वानपथक दाखल – या घटनेनंतर पोलीसांनी तत्काळ श्वानपथकाला पाचारण केले. या श्वानाने चोरी झालेल्या घरांपासून मुंबई- गोवा महामार्गावरील कोंडये येथील पूलापर्यंत माग काढला मात्र तेथे हा श्वान घुटम ळला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून आले असावेत. वा त्यांनी यासाठी दुचाकीचा वापर केला असावा असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी ठसे तज्ञांना पाचारण करून ठसेही घेण्यात आले आहेत.
चोरटे सराईत असण्याची शक्यता – चोरी झालेली पाचही घरे बंद होती. याबाबत कदाचित चोरट्यांनी रेकी केली असावी असाही पोलीसांचा कयास आहे. कटावणीने या सर्व घरांची लॉक चोरट्यांनी तोडली आहेत. त्यामुळे ते सराईत चोरटे असावेत असा त्यांनी चोरी करताना वापरलेल्या क्लुप्त्या पाहता पोलीसांना अंदाज आहे.
खबरदारी घेणे आवश्यक – राजापूर तालुक्यातच नाही तर संपूर्ण कोकणात ग्रामीण भागात अनेक घरे बंद असतात. शिमगोत्सव व गणपती सणाच्या कार्यकाळात ही घरे गजबजतात. त्यामुळे अशी बंद घरे हेरून चोरटे रेकी करून अशा चोऱ्यांचा प्रयत्न करत असतात. घरे बंद करून जाताना आपल्या घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जाव्यात, अथवा बँकांची लॉकर सुविधा घेऊन त्यामध्ये त्या ठेवाव्यात. घरात कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू, रोख रक्कम ठेवू नये असे आवाहन राजापूर पोलीसांनी केले आहे. तर सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार केला जावा असेही आवाहन पोलीसांनी केले आहे. कोंडये येथें जर का एखाद्या घराच्या बाहेर जरी सीसीटीव्ही कॅमेरा असता तर आज तातडीने चोरटयांना पकडण्याबाबत कार्यवाही करता आली असती असेही पोलीसांनी सांगितले. मात्र तरीही सर्व बाजुने तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. राजापूर तालुक्यात अगदी महामार्गालगतच एकाच रात्रीत ५ बंद घरे चोरट्यानी फोडल्याने खळबळ उडाली असून या चोरीच्या तपासाचे मोठे आव्हान राजापूर पोलीसांना पेलावे लागणार आहे.