रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील पहिला टोल नाका सुरू झाला. बोरगाव हद्दीत हा नाका असून बुधवारी मध्यरात्री पहिली पावती फाडली गेली. कोणतेही नोटिफिकेशन न काढता, महत्त्वाच्या मुद्यांचा खुलासा न करता ही घाईघाईने वसुली सुरू करण्यात आल्याने वाहतूकदारांची देखील संभ्रमित अवस्था निर्माण झाली असून, काही अनुत्तरीत प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
रत्नागिरी-नागपूर हा १६६ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील कवठे महांकाळ आणि मिरज या दोन तालुक्यांतून जात असून, तेथील काही उड्डाणपुलांचे काम अजून अपूर्णच तानंग फाटा ते धामणी इथेपर्यंत रस्ता अजून सुरू करण्यात आला नाही आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मिरज शहरावरील वाहतूक ताण कमी होणार असल्याचे समजते.
एरवी प्रवास करताना मिरज ते सोलापूर अंतर पार करायला सरासरी चार तास लागत होते. आता अडीच ते पावणेतीन तासांत हे अंतर पार होणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी धार्मिक पर्यटन केंद्रांशी जोडणारा हा मार्ग आहे. नागजपासून ते तानंग ता. मिरज पर्यंत काही शेतकऱ्यांना अद्याप भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे टोलनाका सुरु करण्याची घाई झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या रस्त्यासाठी स्थानिकांच्या जमिनी अधिगृहित करण्यात आल्यात परंतु, अद्याप काहींना भरपाई मिळालेली नाही. त्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
आजपासून जी टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे, ट्रक, बस वाहनाच्या प्रत्येक फेरीसाठी २२५ रुपये, परतीच्या प्रवासासह ३४० रुपये, मासिक पास शुल्क ७ हजार ५७५ रुपये, असा शुल्क आहे. त्यामध्ये कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलके मोटार यांसाठी एकेरी फेरीसाठी ६५ रुपये टोल आहे. परतीच्या प्रवासासह १०० रुपये, मासिक पास (५० फेऱ्या) २२४० रुपये, जिल्हा अंतर्गत मुद्रांकित वाणिज्य वाहनासाठी ३५ रुपये, हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस प्रत्येक फेरीसाठी ११० रुपये, परतीच्या प्रवासासह १६५ रुपये, मासिक पास शुल्क ३६१५ रुपये आकारण्यात येणार आहे.