29.3 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

गुटखा वाहतूक करणारी गाडी चिपळुणात पकडली

मुंबई - गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी...
HomeRajapurकेवळ स्थानिक नव्हे तर उमेदवार ओबीसीच हवा..! राजापुरात वातावरण तापले

केवळ स्थानिक नव्हे तर उमेदवार ओबीसीच हवा..! राजापुरात वातावरण तापले

स्थानिक पातळीवर रहिवास असलेल्या अनेक नेत्यांना राजकीय पक्षांकडून दाबण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणूकीत स्थानिक उमेदवार पाहिजे अशा भूमिकेने तालुक्यातून उठाव धरलेला असतानाच आता स्थानिक आणि तोही ओबीसी उमेदवारच हवा अशी ताठर भूमिका तालुक्यातील ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. पितृपक्ष संपताच ओबीसी संघर्ष समितीने एका बैठकीचे आयोजन केले असून त्यानंतर एका महामेळाव्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सन १९९५ च्या निवडणूकीत ओबीसी समाजाचे नेते तथा तत्कालिन माजी मंत्री भाईसाहेब हातणकर यांचा भावनिक राजकारणात पराभव केल्यानंतर स्थानिक पातळीवर रहिवास असलेल्या अनेक नेत्यांना राजकीय पक्षांकडून दाबण्यात आले.

यामध्ये शिवसेनेने तर राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात आपली मक्तेदारी असल्याचा अर्विभाव राखण्याचा सतत प्रयत्न केला. वरिष्ठ पातळीवरून उमेदवार जाहिर करताना राजापूरचे मतदार शिवसेनेने गृहीत धरून प्रत्येक विजयानंतर या मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. येथील सेनेच्या आमदाराला केवळ आमदार निधीशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे साचत गेलेला बंडाचा ज्वालामुखी या निवडणुकीत उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतून स्थानिक उमेदवार पाहिजे अशा मागणीने यंदाच्या निवडणूकीत जोर धरलेला असतानाच प्रतीस्पर्धी राहिलेल्या काँग्रेस पक्षातूनही आता स्थानिक रहिवास असलेला व येथील समस्यांची जाण असलेला उम`देवार दिला जावा अशी मागणी झाली आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघ ही शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस पक्षाचीही राजकीय प्रयोगशाळा ठरलेली असताना गेल्या पंधरा वर्षांत तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या ग्रामीण ओबीसी समाजाला पायाभूत सुविधा, आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्थानिक पातळीवरील बेरोजगारी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सन १९९५ पासून एक पिढी उत्तरार्धाकडे जात असताना गेल्या ३० वर्षांत मतदारसंघात प्रचंड नैराश्य आल्याने मोठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर होत आहे.

प्रगत शहरांत राहून राजापूरचे नेतृत्व करण्याची इच्छा अनेक राजकीय पक्षांतील अनेकांची आहे मात्र येथील जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नात आता एखादी स्थानिक व्यक्तीच उमेदवार म्हणून हवी. तीच समरस होऊन किमान कायापालट होण्यासाठी श्रीगणेशा करू शकते अशी भावना स्थानिक व्यक्त करीत आहेत. हाच धागा पकडून आता तालुक्यात सत्तर टक्के समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ओबीसी संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कोणकोणते राजकीय पक्ष आता ओबीसी समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular