जागतिक व्यापारी केंद्राचे महत्वाचे बंदर असलेल्या दाभोळ बंदराच्या लगत असलेला ऐतिहासिक गोपाळगड किल्ला अखेर खासगी मालकीतून मुक्त होत शासनाच्या ताब्यात जाण्याचा मार्ग तब्बल ६ दशकांनंतर मोकळा होतोय. स्वराज्याचा मूर्तिमंत साक्षीदार असलेला अभेद्य किल्ला आता मोकळा श्वास घेणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधल्या अंजनवेल येथे समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला गोपाळगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. समुद्री मार्गावरून होणारे आक्रमण रोखण्याबरोबरच दाभोळ बंदरावरून होणाऱ्या सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या हेतूने बांधलेला हा किल्ला काळाच्या ओघात केवळ ३०० रुपयांना विकला गेला आणि खाजगी मालकीचा झाला. इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला खासगी मालकित गेल्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असताना अंजनवेल येथील एक दुर्गप्रेमी युवक दीपक वैद्य यांनी किल्ल्याचे दस्तावेज काढून त्याचा खरा वारस कोण याचा शोध घेत एकहाती मोहीम सुरू केली.
कायदेशीर लढा – प्रचंड संघर्ष करत महसूल आणि पुरातत्व विभागात झालेला कागदांचा घोळ उजेडात आणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातला किल्ला जो खासगी मालकीचा झाला होता, त्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा उभा केला. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
स्वराज्यातला किल्ला – खरंतर गावातील ऐतिहासिक वास्तूकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब लक्षात आल्यावर स्थानिक दुर्गप्रेमी दीपक वैद्य यांनी शासन दरबारी अनेक कागदोपत्री पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची ही मोहीम तालुका तसेच जिल्हाभरात सर्वदूर पसरली. परिणामी या मोहिमेत नंतर अनेक शिवप्रेमी आणि तत्सम संस्था जोडल्या गेल्या. त्यापैकी एक असलेली शिवतेज फाउंडेशन संस्थादेखील या कायदेशीर लढ्यात सक्रिय झाली. गुहागर तालुक्यात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय गोपाळगड किल्ल्यावर नियमितपणे शिवजयंती साजरी होऊ लागली.
कायदेशीर मार्ग मोकळे – शासन दरबारी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दुर्गप्रेमींमध्ये कमालीची नाराजी पसरली असताना मुलाचे गुहागरमधील पंवार साखरी येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत वास्तव्याला असणारे अक्षय पवार यांनी देखील किल्ल्याच्या संदर्भातील दस्तावेज जमा करत दीपक वैद्य यांच्या सहकायनि न्यायालयीन लढा सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाल्यावर हा किल्ला अधिकृतरित्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आला. पण या निकालाच्या विरोधात अंजनवेलमधील मणियार हे उच्च न्यायालयात गेले. मात्र तिथेही निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे किल्ल्याच्या संदर्भातील सर्व कायदेशीर मार्ग मोकळे झाले आहेत, असे दीपक वैद्य यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. एकूणच सरकारी अनास्थेचा बळी ठरलेला गोपाळगड किल्ला खासगी मालकीतून सरकारच्या ताब्यात आल्यामुळे अंजनवेलमधील पर्यटनात भविष्य काळात आणखी भर पडून गोपाळगड किल्ला स्वराज्याची निशाणी डौलाने फडकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.