नगरपालिकेने महिनाभरात खोकेधारक, हातगाडीधारकांविरुद्ध सलग दोनवेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. त्यानंतर संबंधित विक्रेत्यांना रस्त्यावर मालविक्रीस प्रशासनाने बंदी कायम केली आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांची कोंडी झाली असतानाच नगरपालिकेने त्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. यापुढे खोकेधारक व हातगाडीधारकांसह फेरीवाल्यांसाठी दरदिवशीच्या फीमध्ये दुपटीने वाढ केली आहे. या आधी दरदिवशी २० व ५० रुपये फी आकारली जात होती; मात्र, आता ५० व १०० रुपये आकारणी केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरातील भोगाळे, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसर, चिंचनाका, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलासमोरील परिसर, भाजीमंडई परिसर, बाजारपूल परिसर, पानगल्ली ठिकाणी अतिक्रमण झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच या भागात अस्वच्छतादेखील होत असे. याबाबत नगर पालिकेकडे गेल्या काही दिवसात तक्रारी होत होत्या. अखेर, या तक्रारींची चिपळूण नगरपालिकेने दखल घेत गेल्या महिनाभरात दोनवेळा जेसीबीच्या साह्याने काही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. १५० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.
अशी आहे दरवाढ – सद्यःस्थितीत भाजी, फळ, मच्छी, मटणविक्री रस्त्यालगत किंवा खासगी जागेत केली जात आहे. अशा विक्रेत्यांकडून नगर पालिका दरदिवशी ५० रुपये आकारत होती तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून २० रुपये फी घेतली जात होती; परंतु नुकतेच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या फीमध्ये वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे यापुढे बड्या विक्रेत्यांकडून दरदिवशी ५० रुपयेऐवजी १०० रुपये आकारणी होणार आहे, तर २० ऐवजी ५० रुपये दर आकारला जाणार आहे. ज्या विक्रेत्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे त्यांना १०० रुपये, तर छोट्या विक्रेत्यांना ५० आकारले जाणार आहे.