तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायत हद्दीत चिलान येथे १९९४-९५ मध्ये पाझर तलाव बांधण्यात आला. मात्र, या तलावाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. परिणामी, तलावात उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीसाठा शिल्लक राहत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे वलावाच्या दुरुस्तीसाठी पाचाड ग्रामस्थांनी १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. पाचाड येथे ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या पाझर तलावाचे काम पूर्ण नसल्याने उन्हाळ्याच्या कालावधीत येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तलावात जानेवारीनंतर पाणी राहत नसल्याने तलाव कोरडा पडतो. पाझर तलावासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असून, ज्या शेतकऱ्यानी जमिनी दिल्या त्यानाही कसलाच फायदा होत नाही. पाचाड गावात पाण्याचा कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक स्त्रोत नसल्याने जानेवारी महिन्यात पाणीटंचाई चालू होते. पाचाड ग्रामपंचायतीमार्फत कळवंडे येथील विहिरीतून ३ किलोमीटर दूरवरून पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो, तोही अपुऱ्या प्रमाणात होत असतो.
पशुधन व शेतीसाठी पाणीसमस्या खूप त्रासदायक असून, शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. या तलावाबाबत पंचायत समिती किंवा जलसंधारण विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या तलावाची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे हे निश्चित करावे, पाझर तलावाची दुरुस्ती करावी व गाळ काढावा. या मागणीसाठी १ मे रोजी महाराष्ट्रदिनी पाचाड ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर उपसरपंच रमेश सुर्वे, सदानंद सुर्वे, रवींद्र सकपाळ, गुरूनाथ साळुंखे, विजय साळुंखे, आत्माराम सकपाळ, विकास महाडकर यांच्यासह ४९ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.
तलावाची जबाबदारी निश्चित करा – पाचाड ग्रामपंचायत हद्दीतील चिलान येथील पाझर तलावाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे आहे हे निश्चित करावे. जेणेकरून त्याबाबत आम्हाला दाद मागता येईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.