कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर उत्तर रत्नागिरीतील एसटी व माल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अजूनही या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प आहे. २७जूनपर्यंत चिपळूण-कराड मार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. सद्यस्थितीत मार्गावरून छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवस उलटले, तरी हा मार्ग खुला होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत चिपळूण, खेड, दापोली येथून कोल्हापूर, मिरज, सांगली, अक्कलकोट या मार्गावर धावणाऱ्या एसटी गाड्या आंबा घाटमार्गे मलकापूरकडून वळवण्यात आल्या आहेत. पुण्याकडे धावणाऱ्या एसटी गाड्या ताम्हिणी घाटमार्गे सोडण्यात येत आहेत.
हा मार्ग बंद असल्याने मालवाहतूक, कुरिअर सेवा, तसेच रुग्णवाहिका यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाटण तालुक्यातील वाजेगाव येथील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर तातडीने काम करून छोट्या वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला. २२ जूनपर्यंत अवजड वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता दुरुस्तीमध्ये व्यत्यय येत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती दर्जेदार होणे गरजेचे आहे. त्यामुळए दुरुस्तीचा कालावधी २७ जूनपर्यंत वाढवण्यात आला. त्यानुसार २७पर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

