काल राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुलींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आणि घटनास्थळावरून फरार झालेल्या टेम्पो चालकाचा पोलिसांनी शोध घेतला आहे. त्याचे नाव युगंधर घाडी असून या टेम्पोचालकाला नाटे पोलिसांनी कसून शोध घेऊन ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरी महामार्गालगत असलेल्या बाकाळे रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या कामगारांच्या मुली तुलसी कुमारी कवली शिकारी, आराध्या अनिल राठोड, शिल्पा सुरेश राठोड , सुनिता सुरेश राठोड सर्व रा. विजापूर कर्नाटक हि सर्व दुपारी १.१५ च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभे असताना जैतापूरमार्गे देवगडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या या आयशर टेम्पोने या चौघांना धडक दिली. आणि टेम्पो पुढे काही अंतरावर जाऊन लावला आणि तेथून पळ काढला.
हि धडक एवढी जबरदस्त होती कि यामध्ये तुलसी जागीच गतप्राण झाली आणि गंभीर जखमी झालेल्या आराध्याला जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या शिल्पा राठोड व सुनिता सुरेश राठोड या देखील जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
या अपघाता नंतर चालकाने घटनास्थळापासून पलायन करत पुढे काही अंतरावर टेम्पो उभा करून पळ काढलेला. याप्रकरणी नाटे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे व त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.