रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि त्याची बेकायदेशीर रित्या विक्री केली जाते. त्याच्यावर नक्की कोणाचा वरदहस्त असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. चिपळूण मध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे वाळूचा उपसा केला जात असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा महसूल विभागाकडून संबंधीतांवर कारवाई करण्यास विलंब अथवा टाळाटाळ केली जात असल्याचे समजते आहे.
अखेर, चिपळूण महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी रात्री गोवळकोट येथे अचानक धाड टाकली. यावेळी कालुस्ते पुलाजवळ वाळू साठा आढळला. वाळू उत्खननाचा परवाना मिळण्या आधीच खाडीत उत्खनन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गोवळकोट धक्का येथील कालुस्ते पुलाखाली सुमारे ३५ ब्रास विनापरवाना वाळूसाठा जप्त करण्यात आला. प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार, तसेच गोवळकोट, मालदोली व कापसाळ येथील तलाठ्यांनी आणि भरारी पथकाने गुरूवारी रात्री १० वाजता ही कारवाई केली.
या कारवाईत तब्बल अडीच लाख किमतीचा वाळू साठा जप्त करण्यात आला असून, साधारण ३५ ब्रास इतका हा वाळूसाठा असून त्याचे मोजमाप करून नोंद करणे पहाटे ३ पर्यंत सुरू होते. त्यानंतर हा साठा उक्ताड येथील शासकीय गोदामामध्ये ठेवण्यात आला. परंतु, ही वाळू नक्की कोणी आणली व त्यामागे कोण सूत्रधार आहे, हे अद्याप समलेले असून, त्याचा शोध घेणे सुरु आहे. या मागचा सूत्रधार कोण आहे हे कळले नसल्याने, महसूल विभागाकडून याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या वाळूचा लिलाव महसूल विभागाकडून केला जाणार आहे.