गोव्यातील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ जहाजातून होणारी तेल गळती अपघात ठिकाणापासून दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला पसरणार आहे. तेलगळती आज दि. २० पासून अधिक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कोकण, देवगड, मालवण, वेंगुर्ला किनाऱ्याबरोबरच गोव्यातील किनारेदेखील बाधित होणार आहेत.
विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ५० वाव पाण्यात ‘एमटी पार्थ’ हे १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झाले. रत्नागिरी कोस्ट गार्डकडून प्राप्त माहितीनुसार जहाजातून आज तेल गळती सुरू होण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, वेंगुर्ल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी सामंत, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा बल अनिल जाधव आदी संबंधित उपस्थित होते.
तेल गळती रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑईल स्पील डिस्परसंटची फवारणी हेलिकॉप्टरमधून केली आहे. तेल गळतीच्या ठिकाणी पॅण्डी क्लबच्या स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली निदर्शनास आली आहे.