शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्यांसाठी आहेत. त्या समजून घेणे गरजेच आहे. अशा योजनांच्या नावावर कुणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि नंबर सांगा, त्याच्यावर कारवाई केली जाईल. पैसे मागणाऱ्यांबरोबरच पैसे देणाराही तितकाच दोषी आहे, तुमच्यासाठी असणाऱ्या योजनांसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले. येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षासंच व गृहोपयोगी साहित्यवाटपाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. डॉ. सामंत म्हणाले, शासनाच्या कामगार विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचतात, हे आज इथे झालेल्या गर्दीवरून समजते. गैरसमज पसरवणारे काहीजण असतात. त्यांना माझे सांगणे आहे, मी हा कार्यक्रम थांबवला नव्हता, भ्रष्टाचार थांबवला होता.
गृहोपयोगी संच हा जवळपास १० हजार रुपयांचा आहे. तो मिळवून देण्यासाठी पाचशे ते दीड हजार रुपये घेतात, अशी बातमी माझ्या कानावर आली होती. तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या पैशांवर कोणीही डल्ला मारत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अशा लोकांची तक्रार द्या, शंभर टक्के जेलमध्ये टाकले जाईल. विष्णू विश्राम रावणंग, प्रणाली प्रकाश ताम्हणकर, प्रमोदकुमार रामगोपाळसिंह बघेल, अश्विनी अजय अंबेरकर, प्रतिभा परशुराम हंगीरकर या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे धनादेश वितरण करण्यात आले. त्याचबरोबर मनीषा अनंत भातडे, कामिनी मंगेश मांडवकर, वेदिका योगेश जाधव, धनाजी आण्णा साठे, प्रकाश मधुकर झोरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मदत देणारी ही एकमेव योजना – मूल जन्माला आल्यानंतरही व दुर्दैवी घटना घडल्यानंतरही मदत देणारी ही एकमेव योजना आहे. अशी योजना समजून घेतली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तहयात सुरू राहणार आहे. ती थांबणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.