28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeRatnagiriपाईपलाईन न टाकल्यास आंदोलन, राष्ट्रवादीचा इशारा

पाईपलाईन न टाकल्यास आंदोलन, राष्ट्रवादीचा इशारा

गेले २ वर्षे सुधारित पाणीयोजनेचे पाईपलाईनचे काम सुरू आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेल अशी पाईपलाईन त्वरित टाकून ती पावसाळ्यापूर्वी म्हणजेच १० जूनपर्यंत कार्यान्वित करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला. पालिकेच्या शीळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेले २ वर्षे सुधारित पाणीयोजनेचे पाईपलाईनचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक आणि पुरेसा पाणीपुरवठा होणे गरजेचे होते; परंतु शीळ धरणात पाण्याचा कमी साठा असल्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच पालिकेने नियोजन करून पाणीकपात सुरू केली आहे.

सध्या पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना अजूनही शीळ जॅकवेल ते धरणादरम्यानची सुमारे १७०० मीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण न झाल्यास भरपावसाळ्यातही शहरातील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ येईल. नागरिकांच्या नाराजीला सामोरे जायची जबाबदारी पूर्णतः रत्नागिरी पालिकेची राहिल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. पाणी पंपिंग करण्यासाठी उभारण्यात आलेली तरंगती जेटीही पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तरी या सर्व समस्येचा योग्य तो विचार करून रत्नागिरी पालिकेने हे काम त्वरित करून घ्यावे.

जनतेला भरपावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आणू देऊ नका, असा इशारा दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष नीलेश भोसले, उपाध्यक्ष सनीफ गव्हाणकर, माजी नगरसेवक सईद पावसकर, माजी नगरसेवक बबन आंबेकर, उपाध्यक्ष रवी घोसाळकर यांनी रत्नागिरी पालिकेचे प्रशासन अधिकारी माने यांना निवेदन दिले. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर हे देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular