जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा, अशी मागणी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेने केली आहे. तसे झाले नाही, तर आंदोलन करू, अशा इशाराही दिला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागात नव्याने शिक्षक भरती होऊनही सुमारे नऊशेहून अधिक जागा रिक्त आहेत. मागील शैक्षणिक वर्षात मानधनावर रिक्त जागा भरल्या आहेत. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व स्थानिकांना नवीन भरती झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यात आले. नवीन शिक्षक भरती होऊनही मोठ्याप्रमाणात जागा रिक्त आहेत. स्थानिक मानधनावरील शिक्षक पुनर्नियुक्तीसाठी वारंवार पाठपुरावा करत असून शासन अनुत्सुक आहे.
शासनाची डीएड, बीएड धारकांबद्दल आस्था नाही. अनेक पदवीधर बेरोजगार आहेत. स्थानिकांच्या पाठीशी स्थानिक नेते उभे राहत नाहीत, असे संघटनेकडून आरोप होत आहेत. शासकीय भरतीत स्थानिक आरक्षण नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात परप्रांतीयांचा भरणा होत आहे. रत्नागिरी डोंगरी जिल्हा असल्यामुळे अनेकांना जिल्ह्यात काय चालले आहे, याची माहिती उशिरा पोहोचते. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक मानधनावर संधी दिली, तर ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. तसेचं मानधनावरील काम करण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असा इशारा डीएडे, बीएड बेरोजगार संघटनेचे सुदर्शन मोहिते यांनी दिला आहे.