उन्हाळी सुटी, लग्नसराई आणि विविध कार्यक्रमानिमित्त मुंबई- पुणे शहरातील चाकरमान्यांची पावले गावच्या दिशेने वळू लागली आहेत. यातील अनेकांचा परतीचा प्रवासही सुरू झाला आहे. महिलांसह चाकरमानी प्रवासासाठी एसटीला पसंती देत असल्याने चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकासह जुना बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी चिपळूण आगारामार्फत मुंबई-पुणे मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
मे महिन्यात सुटीचा हंगाम व लग्नसराई, आंबा, काजूचा मोसम असल्याने या महिन्यात विशेषत: मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावी आले आहेत. गावच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या बहुतांश ग्रामीण फेऱ्या प्रवाशांनी फुल्ल भरून जात असल्याचे चित्र आहे. मे महिना संपण्यास अवघा दीड आठवडा शिल्लक असल्याने मिळालेल्या सुट्यांही संपू लागल्याने पुन्हा चाकरमानी मुंबई, पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळेही येथील मध्यवर्ती बसस्थानक फुलून गेले आहे.
मुंबई, पुण्याच्या दिशेने सुटणाऱ्या फलाट क्रमांकावर प्रवासी भारमान वाढल्याचे दिसून येत आहे. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चिपळूण आगार प्रशासनाकडून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये चिपळूण-मुंबई सकाळी ७ वा., सायंकाळी ७ वा., रात्री १० वा., चिपळूण-बोरिवली सकाळी ७.३० वा., दुपारी १ वाजता, चिपळूण-ठाणे सकाळी ८.१५ वाजता, चिपळूण-तळवडे-भांडुप सकाळी ७.३० वाजता, चिपळूण-भांडूप रात्री ८.४५ वाजता, चिपळूण-पुणे स्टेशन सकाळी ८.३० वाजता, चिपळूण-स्वारगेट दुपारी २ वाजता, चिपळूण-पनवेल सकाळी १०.३० वाजता या फेऱ्यांचा समावेश आहे.
प्रवाशांची धावाधाव – गेल्या चार ते पाच वर्षांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे काम रेंगाळले आहे. अपुऱ्या जागेत चिपळूण आगाराचा कारभार सुरू असून, फलाटावर एसटी लावताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावाकडची एसटी शोधताना प्रवाशांचीही धावाधाव उडत आहे. यातच आगार व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी अवघी दोनच बाकडी येथे ठेवली आहेत. त्यामुळे महिला, लहान मुले यांच्यासह वयस्कर मंडळींना भर उन्हामध्ये गाडीची वाट पाहावी लागत आहे.