रत्नागिरी शहरात १२२ कोटींच्या कामांना सुरुवात झाली, याचे स्वागत आहे. पण या कामांना वीस वर्षे लागली. साळवी स्टॉप येथून कामाला सुरुवात झाली असून या कामाला आक्षेप आहे. मुळातच या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. खरेतर रस्त्याची खोदाई केल्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात येते. दोन वर्षांच्या कालावधीत घाईगडबडीने कामे सुरू झाली. शहरात विकास कामे करताना शासनाची दिशाभूल केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सोमवारी (ता. १८) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कीर म्हणाले, रस्त्याच्या कामात नळपाणी योजनेसाठी सुमारे २० किलोमीटर लाईन नवीन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा खर्च आहे. मात्र शहराची नवीन नळपाणी योजना अजून सुरू असताना हा खर्च कशाला, नवीन पाणी योजनेमधील २० किमी पाईपलाईन रस्त्याच्या कामात येत आहे.
ती काढून न टाकता नवीन पाईपलाईन टाकण्याचा समावेश करून मंजुरीही दिली गेली आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे. यामध्ये शासनाचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान केले जात आहे. ही सर्व जबाबदारी पालिकेची आहे. यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, माजी नगरसेवक सईद पावसकर, बबन आंबेकर, शहर उपाध्यक्ष सनिफ गवाणकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांच्या तोंडाला डांबर लावणार – मिलिंद कीर हे मॅनेज झाले, अशी चर्चा सुरू झाली; पण ते तसे नाहीत. मिलिंद कीर यांनी राजकारणात कुणाचीही हांजी हांजी केली नाही. ज्यांना असे वाटते, त्यांच्या तोंडाला काळे डांबर लावले जाईल, असा इशारा मिलिंद कीर यांनी दिला.