कोयना प्रकल्पातून १५ मार्च ते १४ मे २०२५ या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक अशी तब्बल ६९२.६८ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. कोयनेचे पाणी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये, यासाठी धरणातील शक्य तेवढे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाताना कोयनेच्या पाण्यामुळे पूर येणार नाही, आलाच तर मोठे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोयना धरणात ११२ टीएमसी पाण्याची आवक झाली तर सिंचनासाठी ऐतिहासिक ३८ टीएमसी पाणीवापर झाला होता. कमी पाणीसाठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात पश्चिम वीजनिर्मितीच्या लवादाला कात्री लागल्याने वीजनिर्मिती कमी झाली होती. यावर्षी धरणात १८३.६१ टीएमसी पाण्याची आवक तर अकरा महिन्यानंतरही धरणात अपेक्षित पाणीसाठा शिल्लक राहिला.
धरणात पाणीसाठा शिल्लक राहिला तर तो धरणाच्या वक्र दरवाजावरून सोडावा लागतो. या पाण्यातून वीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे महानिर्मिती कंपनीचे मोठे नुकसान होते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये महापूर येतो. कोयना धरणातून कोळकेवाडी धरणात येणाऱ्या पाण्यामुळे चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती उद्भवते, अशी ओरड ही गेली काही वर्षे सुरू आहे. त्यामुळे २०२१च्या महापुरानंतर पावसाळ्या अगोदर धरणातील पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन केले जात आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात पश्चिमेकडे २४.४६ टीएमसी पाण्यावर पोफळी टप्पा एक व दोन मधून १९९.७५२ दशलक्ष युनिट, कोयना चौथा टप्पा ७१२.१९५ दशलक्ष युनिट, अलोरे वीजगृह १९४.८९८ दशलक्ष युनिट अशी ११०६.८४५ दशलक्ष युनिट तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या ११.१७ टीएमसी पाण्यावर धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ४८.५२६ दशलक्ष युनिट अशी एकूण ३५.६३ टीएमसी पाण्यावर ११५५.३७१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
तसेच १५ मार्च ते १४ मे २०२५ या अवघ्या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक, अशी तब्बल ६९२.६८ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती करण्यात आली. आता धरणातील पाण्याची पातळी २०७८ मीटर इतकी आहे. ती पुढील दोन दिवसात २०६७मीटरवर येईल. त्यानंतर चौथ्या टप्प्याकडे जाणारा एक टनेल बंद होईल; मात्र दुसऱ्या टनेलमधून पाणीपुरवठा सुरू राहील. त्या पाण्यावर शक्य होईल तेवढीच वीजनिर्मिती मागणीच्या काळात केली जाईल.