ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागामध्ये देखील वन्य प्राण्यांचा उच्छाद मोठ्या संख्येने वाढला आहे. आधीच शहरी भागामध्ये गुरे रस्तावर संपूर्ण रस्ता अडवून बसलेली असतात त्यामुळे वाहतुकीस कायमच अडथळे निर्माण हो असतात. त्यामध्ये कुत्र्यांची संख्या देखील कमी नाही. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला झोपलेली कुत्री कधी अंगावर येतील याचा नेम नाही. आणि अचानक गाडीच्या पाठी लागलेल्या कुत्र्यांमुळे चालकाची सुद्धा भंबेरी उडते. त्यामुळे वारंवार अपघात घडण्याचे प्रकार घडत असतात.
रत्नागिरी शहर परिसरात सध्या माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी ही माकडे टोळ्यांनी फिरत असतात अचानक ही माकडे रस्त्यावरून उडय़ा मारून रस्ता क्रॉस करतात त्यामुळे अनेक वेळा दुचाकी व अन्य वाहनांना अपघात होण्याचे प्रकार झाले आहेत. सकाळी जेलरोड येथील चढावरून मनोरुग्णालयाजवळ रस्त्यावरून रिक्षा जात असताना अचानक रस्त्याच्या मध्ये माकडाने रिक्षासमोर उडी मारली, माकड अचानक मधोमध आल्याने रिक्षा चालकाने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले या प्रकारात रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा भर रस्त्यातच उलटी झाली सुदैवाने या अपघातात रिक्षाचालक बचावला मात्र या अपघातामुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
माकडाने अचानक मारलेल्या उडीमुळे नव्या कोऱ्या रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्य रस्त्यावरच ती पलटी झाली. रिक्षा खरेदी काहीच दिवसांपूर्वी करण्यात आल्याचे मिळालेल्या माहितीवरून कळले. त्यामुळे या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे वाहनांचे देखील नुकसान झाले, चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा त्यामधून ते सुखरूप वाचले.