सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी झालेल्या डझनभर चोऱ्यांमुळे जिल्हा हादरून गेला आहे. कोरोना काळामध्ये पूर्णपणे बंद झालेली चोरीची प्रकरणे हळूहळू डोके वर काढायला लागली आहेत. आणि एकाच दिवशी रहदारीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, वैभववाडी आणि कणकवली शहरात चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर आज पहाटे तरळे बाजारपेठेतील तब्बल १२ हून अधिक दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. यात एका दुकानदाराची तब्बल ४ लाखाहून अधिक रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बाजारपेठेतील घटनास्थळी धाव घेतली.
चोरट्यांनी रेकी करून ही दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे. कारण ज्या दुकानांच्या आतील भागात घरे आहेत अशी दुकाने फोडली नसल्याची प्रमुख बाब समोर आली आहे. खुले आमपणे चोरट्यांचा वावर सुरू असताना पोलिसांकडून आता ठोस उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध जारी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे. आता या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.
पोलीस यंत्रणा देखील या डझनभर चोऱ्यांमुळे गोंधळून गेली आहे. आणि तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरू लागली आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुरख्याची मदत घेत चोरांनी चोरी केल्याची माहिती समोर आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.