लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगेनिक केमिकल्स कंपनी पीएफएएस या घातक रसायनाची निर्मिती करत असल्याचा आरोप होत असून त्याच्या निषेधार्थ कंपनी विरोधात स्थानिकांनी मोर्चा काडून आंदोलनही केले होते. याच आंदोलनाची दखल घेत राज्यसभेमध्ये हा प्रश्न खा. प्रमोद तिवारी यांनी उपस्थित केला. अशा प्रदुषणकारी रसायनांच्या उत्पादनांवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली. देशात याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नसताना अशा प्रकारचे घातक उत्पादन कोणत्या अधिकारात केले जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून या घातक रसायनाची निर्मिती तत्काळ थांबवावी अशी मागणी खा. तिवारी यानी केली. खा. तिवारी यांनी यावेळी सभागृहात सांगितले की, फॉरेव्हर केमिकलमुळे मानवी आरोग्यावर अनिष्ठ परिणाम होत आहेत. पाण्याचे आणि जमिनीचे प्रदुषणही होते. त्याचे दुष्परिणाम शेवटी तेथील नागरिकांनाच भोगावे लागतात असा स्पष्ट इशारा पर्यावरणतज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे हे उत्पादन तातडीने थांबवावे अशी मागणी त्यांनी केली. या परिसरातील जनतेने या प्रदुषणाला तीव्र विरोध केला आहे. याच सभागृहाचे माजी सदस्य खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले आहे ही बाबदेखील खा. तिवारी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र सरकारने याबाबतचे आपले धोरण स्पष्ट करावे आणि अशा घातक रसायनांच्या उत्पादनावर बंदी किंवा कठोर निर्बंध घालावेत अशी मागणी केली. दरम्यान आपल्या कंपनीकडून कोणतेही नियमबाहय काम केले जात नाही. घातक रसायनांची निर्मिती केली जात नाही. आवश्यक त्या परवानग्या घेवून आणि प्रदुषण टाळण्याच्या सर्व उपाययोजनांसहित आपल्या कंपनीचे उत्पादन सुरू आहे. सर्व नियमांचे पालन होते आहे. आपल्या कंपनीवर होत असलेले आरोप निराधार आहेत असे लक्ष्मी ऑरगेनिक कंपनीने स्पष्ट केले आहे.

