मुंबईच्या सगळ्याच वेळी बाहेर पडताना तोबा गर्दी दिसून येते. त्यामुळे वेळेवर आणि आरक्षित खाजगी वाहनांची मागणी वाढत चाललेली दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना येता जाता आरामशीर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी, बेस्टने नवीन काहीतरी समाजयोगी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालयीन वेळेत बेस्ट बसगाड्यांना होणारी गर्दी आणि खासगी प्रवासी बसगाड्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना बसमधील आसनही आगाऊ आरक्षित करता येईल. ही सेवा सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या किंवा कामावरून परतणाऱ्या नागरिकांना रोजची टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नाही. अनेक वेळा ठराविक भागात जायचे नसल्याने टॅक्सीचालक भाडे नाकारतात. अशा विविध कारणांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होतो. त्यामुळे हळूहळू अनेक प्रवासी मोबाइल ॲपआधारित ओला, उबेर सारख्या खासगी टॅक्सींमधून प्रवास करणे पसंत करतात. प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याने या सेवांनी विविध योजनाही सुरू केल्या आहेत. याशिवाय मुंबई उपनगरात ॲपआधारित खासगी प्रवासी वातानुकूलित बस सेवाही सुरू झाली आहे. त्याकडेही मोठ्या संख्येने प्रवासी आकर्षित झाले आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमानेही या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सेवा कशी सुरू करता येईल याबाबत सध्या अभ्यास करण्यात येत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आरामदायी ४५ आसनी १०० लक्झरी बसगाड्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत.