२४ जुलैनंतर तेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली होती. अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना खाद्यतेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इतर तेलांपेक्षा शेंगदाणा तेलाचे दर अद्याप स्थिर आहेत. सर्वाधिक खपाचे पामतेल १५ किलोच्या डब्यामागे ४५० ते ५०० रुपये, सरकी तेल २२५ ते ३०० रुपये, सूर्यफूल तेलाचे दर १५० रुपयांनी कमी झाले आहेत. परंतु, तेलाच्या घटलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांच्या दरामध्ये घट अपेक्षित होती. मात्र हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थ्यांच्या किमती मात्र चढ्याच कायम आहेत. त्या कधी कमी होतील याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ५०० रुपये कमी झाले आहेत. तेलाच्या किमती घटल्यानंतर तेलापासून बनवण्यात येणारे सर्व पदार्थ मात्र महागच झाले आहेत. सर्वसामान्यांना आवडीचा खाद्य पदार्थ वडापाव हा सुद्धा दहा रुपयावरून पंधरा ते पंचवीस रुपयांपर्यंत पोहोचला. नाश्त्याचे पदार्थानी देखील शंभरी गाठली आहे. जेवणाची ताटंही महाग झाली आहेत. तेलाच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे फलक अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हॉटेलचे जेवण महागच पडत आहे.
सामान्य नागरिकांमधूनही सगळीकडेच महागाईबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली असताना तेलाच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दर खाली येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात होती; मात्र जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय, वडापाव विक्रेते आणि स्नॅक्स सेंटरमधील खाद्यपदार्थांचे दर अद्यापही वाढलेलेच आहेत. तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर देखील हॉटेल व्यावसायिक सामान्य नागरिकांची वाढीव दर ठेवून एका प्रकारे लूट करत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. खाद्यपदार्थांचे दर वाढल्यामुळे महागाई वाढल्याची जाणीव नागरिकांना झाली असल्याचे जनता म्हणत आहे.