देशात सामाजिक एकता व बंधुभाव वाढावा, देशात लोकशाही नांदावी, यासाठी कॉंग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. यात्रेत चिपळूण तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष जबले यांच्यासह पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशातील सर्वसमान्य नागरिकांच्या व्यथा समजून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा नेता देशाला राहूल गांधी यांच्या रुपाने मिळाला आहे. त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा निर्धार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे, अशी माहिती कॉंग्रेसच्या अल्पंख्याक सेवादलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले यांनी दिली.
यात्रेबाबत माहिती देताना अल्पसंख्याक सेवादलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले म्हणाले, या यात्रेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले गेले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची प्रत देतानाचा देखावा, वारकारी दिंडी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतानाचा देखावा सादर केला.
राहूल गांधी यांचा “नफरत तोडो, भारत जोडोचा संकल्प” आम्ही ग्रामीण भागात पोहचवणार आहोत. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिलांपर्यंत त्यांचा संदेश पोहचवला जाणार आहे. देशात निर्माण झालेली कटुता संपली पाहिजे, शेतमालाला भाव, महागाईवर नियंत्रण व हाताला काम मिळावे शेतीला सिंचनाला पाणी पुरवठा, सर्वसमान्य नागरिकांच्या व्यथा समजून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा नेता देशाला हवा होता. तो राहूल गांधी यांच्या रुपाने मिळाला आहे.
महागाईमुळे सामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. शेतमाला हमी भाव वाढवून मिळाला तर शेतकरी सुखी होईल. या प्रश्नांकडे राहूल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांमधून एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल असा आशावाद त्यांनी बोलताना व्यक्त केला.