चिपळूण शहरातील एटीएम फोडून आतील १४ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. हा प्रकार गणेशोत्सवाच्या दिवशी पहाटे पाच जणांच्या टोळीने केल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर चतुरता दाखवत ते खासगी गाडीने गुहागर बायपासमार्गे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचा वापर न करता पर्यायी रस्त्याने वाहतूक केल्याचे समजले आहे. मुंबईला जाताना पाच जणांनी चौदा लाख रुपयांचे वाटप करून प्रत्येकाचा वेगवेगळा हिस्सा वाटून घेतला. मोठ्या प्रमाणात पैसे हाती आल्यानंतर इरफानने प्रेयसीसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन केला होता. इरफानसोबत वासिफ, शादाब हे दोघे देखील गोव्याला आले.
चिपळूण शहरातील भोगाळे येथील युनियन बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून टोळीतील एकूण पाचजण मुंबईला निघून गेले. पोलिसांच्या तपासात संशयित आरोपी निश्चित झाले होते. परंतु, त्यांचा नेमका ठावठिकाण कुठे आहे, याचा शोध सुरू होता. जिल्हा पोलिसांच्या पथकाला गोव्यात त्यांचे लोकेशन ट्रेस झाले. त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून त्यांचा पत्ता शोधून काढला.
रत्नागिरी पोलिसांचे पथक तिघांना ताब्यात घेण्यासाठी गोव्यात पोहचले. या वेळी इरफान प्रेयसीसाठी गोव्यात आल्याचे स्पष्ट झाले. तेथे इरफानसोबत त्याची प्रेयसी व अन्य एक मुलगी आढळून आली. त्यामुळे इरफान व त्यांच्यासोबत गोव्यात अन्य ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले त्याचे दोन साथीदार पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची माहिती पुढे आली आहे. पुन्हा सर्व एकत्र आल्याने आणि पोलिसांच्या अद्ययावत यंत्रणेमुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करणे शक्य झाल्याने काही कालावधीतच चोरटे पोलिसांच्या ताब्यात सापडले.