लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गणेशभक्तांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने महामार्ग गजबजला आहे. आधीच महामार्गावरील खड्ड्यांतून गणेशभक्तांच्या नशिबी जीवघेणा प्रवास असतानाच त्यात वाहतूककोंडीचीही भर पडल्याने चाकरमान्यांना मुंबई गाठताना अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत आहे. महामार्गावर दिवसरात्र तैनात पोलिस यंत्रणेचाही दमछाक होत आहे. रखडलेला महामार्ग गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत आणून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेला दावा फोल ठरल्याने गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडली.
महामार्गावर यंदाही गणेशभक्तांच्या मार्गात खड्डयांचे “”विघ्न” कायम राहिले. महामार्गावरील पळस्पे, कोलाड, माणगाव येथे होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. एकीकडे खड्ड्यांतून गणेशभक्तांचा जीवघेणा प्रवास सुरू असताना दुसरीकडे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघातांचा धोकादेखील कायम आहे. सोमवारी वडखळ, पळस्पे फाटा, माणगाव नागोठणे, येथे महामार्ग चक्काजामच झाला. वाहतूक सुरळीत करताना तैनात पोलिस यंत्रणांच्या नाकीनऊ आले. पनवेलजवळ पळस्पे फाट्यावर खड्यांमुळे ६ ते ७ किलोमीटर तर माणगावजवळ ४ ते ५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे गणेशभक्तांना रखडपट्टीचा प्रवास करावा लागत आहे.