तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील चार कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यामध्ये सोडल्याची घटना ३० नोव्हेंबरला घडली. यामुळे सोनपात्रा नदीमधील पाणी दूषित होऊन ते खाडीमध्ये मिसळल्याने खाडीतील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. परिणामी, कोतवलीतील संतप्त ग्रामस्थ संबंधित कारखान्याच्या गेटवर धडकले. दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, लोटेतील कारखानदार आणि कोतवलीचे ग्रामस्थ यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांना जाब विचारला होता. कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यामुळे ते रासायनिक सांडपाणी नदीमध्ये मिसळले होते. या घटनेचा गैरफायदा घेऊन काही कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यामध्ये सोडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कोतवलीचे ग्रामस्थ संतप्त झाले.
या यंत्रणांबरोबर बैठकीची मागणी करून त्यांना वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत माहिती दिली; परंतु ही बैठक झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पुन्हा काही उद्योजकांनी सांडपाणी नाल्यात सोडण्याचा उद्योग सुरूच ठेवल्यामुळे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी थेट संबधित कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर धडक देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी तत्काळ भेट देऊन संबंधित कारखान्यांचे सांडपाणी तपासून त्यांचे नमुने घेतले व ते प्रयोगशाळेत तपासण्यासाठी नेले. मात्र संतप्त ग्रामस्थांनी जर कठोर कारवाई केली नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

