चिपळूण तालुक्यातील पोसरे येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून विसर्जन घाटाचे काम केले. काम सुरू असताना ते सुमार दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. मात्र झालेले काम व्यवस्थित केले गेले आहे कि नाही हि तपासणी करण्याचे सोडून संबंधित ठेकेदारास बिल अदा करण्यात केले. त्याच दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत कामासाठी वापरलेल्या लाद्या पूर्णपणे उखडून वरती आल्या, त्यामुळे केलेल्या कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे ते लक्षात येते.
पोसरे येथे पावसाळ्यापूर्वी पाच लाख खर्चून बांधलेल्या गणेश विसर्जन घाटाची पुरती दैना उडाली आहे. पहिल्याच पावसात घाटाची लादी उखडून गेली. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पंधराव्या वित्त आयोगातून ५ लाखाचा निधी गणेश विसर्जन घाटासाठी मंजूर केला होता. नियुक्त ठेकेदाराने मार्च महिन्यात काम पूर्ण केले. काम सुरु असतानाच दर्जाबाबत शंका घेतली जात होती.
दरम्यान, अतिवृष्टीत घाटाच्या लाद्या पूर्णपणे उखडल्या आहेत. या लाद्या आता ग्रामस्थांनी एकत्र करुन ठेवल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र ठेकेदाराकडून अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे. सध्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन देखील अशाच परिस्थितीमध्ये करण्यात आले. तर आता गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीला देखील भक्तगणांना अशाच प्रकारे त्रास सहन करावा लागणार असल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजगी पसरली आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा सुयोग्य वापर न करण्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.

