चिपळूण तालुक्यातील महामार्गापासून ते अंतर्गत सर्वच रस्त्यांची खड्डे पडल्यामुळे चाळण झाली आहे. एवढे खड्डे पडले आहेत की, खड्ड्यात रस्ता शोधावा लागत आहे. शहरात रस्त्यावर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य आहे, असे असताना दुचाकी किंवा इतर वाहनांवर पोलीस कारवाई करीत आहेत. माजी सभापती शौकत मुकादम यांनी वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा पोलिसांनी प्रथम रस्त्याची वाट लावणार्या व वेळेत काम पूर्ण न करणार्या ठेकेदार कंपनीवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे.
रस्ता खराब असताना दुचाकी, चार चाकीवाल्यांना पोलिसांचा त्रास देखील वाढला आहे. रस्त्यावर दुतर्फा गाडी उभी करण्यास जागा नाही, एवढे खड्डे रस्त्यात झाले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालक गाडी कोणत्या बाजूला उभी करायची हेही समजून येत नसल्याचे म्हणत आहेत. एखाद्या व्यक्तीकडे लायसन्स नसेल किंवा पीयुसी किंवा इतर आवश्यक कागदपत्रे नसतील, तर गुन्हे दाखल करा, त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, पण रस्ताच जागेवर नसल्यामुळे गाडी कुठे उभी करायची हे लक्षात येत नाही.
पोलिसांनी गाडी मालकाला विचारणा न करता थेट फोटो काढून साध्या दुचाकी चालकांकडून दोन हजार, पाच हजार असा दंड आकारण्यात येत आहे. ते आम्ही कितपत सहन करायचं. काही वरिष्ठांनी पोलीस अधिकार्यांच्याकडे तक्रार केली आहे. एखाद्या गरीब टू व्हीलर वाल्याकडे पेट्रोल टाकायला पैसे नसतात, जर तुम्ही एवढा दंड आकारताय, तर हे कितपत योग्य आहे. तरी पोलिसांनी वरील विषयामध्ये लक्ष घालून विशेष सहकार्य करावे अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे.