कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या संसर्गाच्या वाढण्याच्या भीतीने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा स्तरावर विशेष काळजी घेण्याचे सुचविले आहे. त्याचप्रमाणे शासनाकडील २७ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाचा भंग झाल्यास किंवा केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शर्तभंग प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याकामी व दंड आकारण्यासाठी, दंड वसुलीसाठी, यंत्रणा व अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी डॉ.बी.एन. पाटील यांनी प्राधिकृत केले आहे.
कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी रक्कम रु. ५००/- दंड आकारण्यात येणार असून पोलीस प्रशासन, स्थानिक नगरपंचायत-नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायतींना दंड वसूलीसाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
ज्या संस्था उदा. शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, दुकाने मॉल, हॉटेल, भाजीपाला विक्रेते, रस्त्यावरील स्टॉल, चित्रपटगृहे, नाटयगृहे, गार्डन, पार्क, वस्तूसंग्रहालये, पर्यटन स्थळे इत्यादी यांच्या परिसरात एखाद्या व्यक्तीने नियम मोडल्याचे दिसून आले तर अशा संस्थांना किंवा आस्थापनांना रु. १० हजार इतका दंड ठोठावणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन/स्थानिक नगरपंचायत, नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन यांना अधिकृतपणे अधिकार दिलेले आहेत.
कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरुप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपये इतका दंड करण्यात येईल. दंड वसुलीसाठी पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व संबधित यंत्रणा, विभागीय नियंत्रक व संबधित यंत्रणा, स्थानिक नगरपंचायत-नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत यांनी प्राधिकृत अधिकार देण्यात आलेले आहेत.