रास्त दराच्या धान्य दुकानासाठीच्या धान्य वितरण व्यवस्थेतील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला असून, पॉस मशिन प्रणालीद्वारे धान्य देणे त्रासदायक ठरत आहे. शासनाने पॉस मशीनवरच धान्य वितरित करा, अशा सूचना रेशन दुकानदारांना दिल्यामुळे लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत आहे. राज्याचा सर्व्हर डाऊन असल्याने ई-पॉस मशीन संथगतीने चालत आहेत. कधी कधी तर पूर्णपणे ठप्प होतात. अनेकदा थांबूनही ई-पॉस मशीन पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसते. अशावेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे, असा प्रश्न पडतो. मशीनमधील त्रुटींमुळे धान्य वितरित होत नसल्याने दुकानदारांचे कमिशनही काढले जात नाही. दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची समस्या येत असल्याने दुकानदारांनी वायफाय घेतले आहे; पण राज्याचेच सर्व्हर डाऊन असल्याने पॉस मशीनची समस्या कायम आहे.
लाभार्थ्यांना वारंवार खेटे मारावे लागत असल्याने दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात खटकेही उडत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनयमांतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण करण्याचे शासनाने निर्देश आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे धान्य वितरणात अडथळे येत आहेत. शासनाने तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोवर ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत; मात्र अजून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. पॉस मशीन अपडेट झाल्यानंतर सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार येत आहे. या संदर्भात येत असलेली अडचण शासनाला कळवण्यात आली असून, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
तातडीने उपायोजना करा… – रास्त दराच्या धान्य वितरण व्यवस्थेतील सर्व्हर डाऊन होत असल्याने लाभार्थीना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते, प्रसंगी धान्यासाठी हेलपाटे माराव्या लागतात. याची दखल प्रशासाने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.