29.7 C
Ratnagiri
Saturday, May 17, 2025

कोयनेचे पाणी मुंबईत नेण्यासाठी भूगर्भ चाचणी

कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी...

राजापुरात वीज पडून दोघे जखमी; घराचे नुकसान

वळवाच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे....

जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली…

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची...
HomeRatnagiriविजेचा धक्का बसून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

विजेचा धक्का बसून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

विद्युतपुरवठा बंद असताना धक्का कसा लागला, याचे कारण समजू शकले नाही.

शहरातील निवखोल येथे महावितरणच्या खांबावर काम करणाऱ्या फणसवळे येथील कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसला. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. कुंदन दिनेश शिंदे (वय २१, रा. भावेवाडी, फणसवळे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच फणसवळे येथील ग्रामस्थ, मित्रमंडळीने रुग्णालयात गर्दी केली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. वडिलांसह नातेवाइकांनी रुग्णालयात टाहो फोडल्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

या घटनेने फणसवळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दुपारच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी व कुंदन हे निवखोल येथे काम करत होते. महावितरणच्या खांबावरील तुटलेली वाहिनी जोडत होता. खांबावर चढण्यापूर्वी तेथील वीजपुरवठा बंद केला होता. सोमवार असल्याने पूर्ण लाईन बंदच होती; मात्र वायर जोडताना त्याला धक्का लागून तो चिकटून राहिल्याने बेशुद्ध पडला. त्याला खाली उतरून तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिस फौजफाटाही दाखल झाला.

जनरेटर चर्चेत – दरम्यान, विद्युतपुरवठा बंद असताना धक्का कसा लागला, याचे कारण समजू शकले नाही. धक्क्याबाबत अनेकांच्या मनात शंका होती; मात्र निवखोल परिसरात सोमवारी वीज नसल्यामुळे कुणाकडे जनरेटर लावला असला तर रिव्हर्स करंटचा शॉक लागू शकतो, असे रुग्णालयात जमा झालेल्या कंत्राटी कामगारांनी सांगितले. रिव्हर्स करंटचा जोरदार धक्का कुंदनला बसून त्याचा मृत्यू झाला असावा, असे बोलले जात होते.

कंत्राटींची सुरक्षा वाऱ्यावर – महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास ३०० च्या आसपास आहे. या कामगारांना सुरक्षेच्यादृष्टीने सेफ्टीगार्ड पुरवण्यात येत नाहीत. महावितरणच्या खांबावर प्रशिक्षित लाईनमनने चढून दुरुस्तीची कामे करण्याचा नियम आहे. मदतनीस कामगारांना खांबावर चढवून त्यांच्याकडून कशी कामे करवून घेतली जातात, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यासाठी कंपनीकडून कोणतीही वर्कऑर्डर दिली जात नाही. तुटपुंज्या पगारावर धोकादायक काम करवून घेऊन आज हकनाक तरुणाचा बळी गेल्याची चर्चा रुग्णालयात सुरू होती.

RELATED ARTICLES

Most Popular