भाजप कार्यकर्ते तुमच्या मनात शिरण्यासाठी राममंदिराचा मुद्दा सांगतील. यांनी रामाच्या नावाने जमविलेला निधी पळविला, विटा चोरल्या, मंदिराचा कळस बांधलेला नसताना प्राणप्रतिष्ठा केली. रामाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत असायला हवेत. तिथे बाल्यावस्थेतील रामाची मूर्ती ठेवली. मोदीजी बालरामाला हात धरून मंदिरात नेत असल्याचे फोटो लावले. या गोष्टींना फसू नका. भाजपने देशाची संस्कृती नासविली आहे. देश वाचविण्यासाठी, संविधान टिकविण्यासाठी आणि पक्ष फोडणाऱ्या आणि चोरणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गीतेंच्या प्रचार सभेत केले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील भवानी सभागृहात अनंत गीतेंच्या प्रचाराची सभा झाली. यावेळी जाधव म्हणाले, जाणीवपूर्वक मी प्रचारापासून दूर असल्याचा, नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत; परंतु पक्षाने माझ्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात प्रचाराच्या सभांना जात आहे; मात्र निवडणूक कोणतीही असो त्याचे काटेकोरपणे सूक्ष्म नियोजन आपण आजपर्यंत करीत आलो आहोत. यावेळी प्रत्येक गावात किती मतदान झाले, प्रवाही मतदान किती आहे, आपले मतदान कसे वाढेल, याचा विचार गावागावांतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केला आहे.
मुस्लिम समाजाची ९०-९५ टक्के मते मिळावीत म्हणून मुस्लिम कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी, बौद्ध समाजाची कमिटी, गावाची कमिटी, प्रत्येक गावावर लक्ष ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी असे नियोजन करून काम सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील प्रमुख कार्यकर्त्यांद्वारे हे नियोजन प्रत्यक्षात अंमलात आणले जात आहे. त्यांच्याकडून मला अहवाल मिळतो अडचणी सोडवतो. निवडणुकीच्या कामात मी पणा ठेवत नाही, हे सारे तुम्हा सर्वांना माहिती आहे. विधानसभा क्षेत्रात एकही गाव असे नाही जिथे मी निधी दिला नाही. माझे काम मी चोख केले आहे. आता त्यांचे मतदानातून प्रत्यंतर देण्याचे काम तुमचे नाही का? आजच्या निवडणुकीत संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे, असे जाधव म्हणाले.