दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. दसरा मेळावा हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच सोनं लुटणारा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्याचे आकर्षण असणार आहेत, असं दीपक केसरकरांनी सांगितलं. जनतेला सगळी उत्तरं दसरा मेळाव्यात समजतील. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. शिवसेनेचा शिंदे गट का स्वतंत्र झाला याचं उत्तरही दसरा मेळाव्यात मिळेल, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.
शिवतीर्थवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. अभूतपूर्व गर्दीचा असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहेत.
दसरा मेळाव्यावरून ठाकरे-शिंदे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. दोन्हीं गटाकडून राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळावा न भूतो न भविष्यती होण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.