रत्नागिरी शहरातील मांडवी येथील समुद्रामधील चॅनल गाळाने भरला गेला असून राजीवडा,भाट्ये परिसरातील मच्छीमारांना त्यामुळे रोज नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. खोल समुद्रात मच्छीमारी करून नौका परत येत असताना अनेक नौका या चॅनलमध्ये फसत आहेत. परवाच्या दिवशी अशाच दोन नौका मच्छीमारी करून परतल्यानंतर गाळात फसल्या छोट्या बोटी गाळ्यात फसल्यानंतर त्याना बाहेर निघण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जे भाट्ये मार्गे गेलेत ते सुरळीत पोहोचले आणि जे राजिवडा मार्गाने गेलेत ते मात्र या गाळामध्ये फसले.
भाट्ये, कर्ला, राजिवडा,फणसोप या विभागातील मच्छीमारी नौका कायम या समुद्र मार्गे प्रवास करत असल्याने अनेक वेळा ओहोटीच्या वेळी त्यांना नौका गाळात रुतण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भरती ओहोटीची वेळ पाहूनच नौका कोणत्या मार्गे बाहेर काढायची हे मच्छिमार ठरवत आहेत. राजिवडयाकडे जाणाऱ्या समुद्री मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने, या मार्गाने प्रवास करताना मच्छीमारांना नाकी नऊ येत आहेत.
चिखलामध्ये इंजिन देखील रुतत असल्याने इंजिन बंद करून बांबूंच्या मदतीने खोली तपासत या नौका हळूहळू काढाव्या लागत आहेत. या परिसरातील मच्छीमारांना हा चॅनल वाळूने भरल्यामुळे वारंवार संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यातील वाळू उपसा करावा अशी मच्छीमारांची मागणी आहे. मांडवीच्या मुखाजवळील गाळाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, जोपर्यंत एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची वाट शासन पहात आहे का? असा थेट सवाल मच्छिमाऱ्यांकडून शासनाला केला जात आहे.