येथील बाजारपेठेमध्ये हंगामी व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतुकीला अडथळा करून हे फेरीवाले रस्त्यावर व्यापार करतात. या फेरीवाल्यांसह हंगामी व्यापार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी महिला व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. शहरातील व्यापारी बांधव कर भरून व्यवसाय करतात. मात्र, हंगामी फेरीवाले विक्रेते शासनाला कोणताही कर देत नाहीत. रस्त्याच्या कडेलाच वस्तू माडून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यावर पालिकेचा अंकुश नाही.
त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापारी महिला मंडळाच्या वतीने स्वाती भोजने, लता भोजने, स्वाती देवळेकर, निर्मला जाधव, तृप्ती कदम अशा अनेक महिलांनी शुक्रवारी पालिकेवर धडक दिली. प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबरकर यांना निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसात ही कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येने महिला आणि व्यापारी मोर्चा काढणार असा इशारा महिलांनी दिला.