साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीचा धक्का लागल्याने जीव गमवावा लागला, तर आजीला वाचवण्याच्या प्रयत्नात नातू जखमी झाला. हृदया शांताराम मोरे (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. या प्रकारामुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत घडलेले वृत्त असे, आज पहाटे साखरपा जाधववाडी येथील वृद्धा हृदया शांताराम मोरे घराबाहेर आल्या आणि काम करताना घराजवळ असलेल्या वीज खांबावरून तुटून लोंबत असलेल्या वीज वाहिनीला त्यांचा स्पर्श झाला. प्रवाहित वाहिनीचा त्यांना जोराचा धक्का लागला. स्वतःला सोडवण्यासाठी मोरे यांनी आरडाओरड सुरू करताच मोरे यांचा नातू ओम याने आजीला सोडवण्यासाठी प्रयत्न केला; मात्र या गोंधळात त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याचे वडील प्रकाश मोरे आणि गणेश मोरे यांनी दोघांना साखरपा प्राथमिक केंद्रात आणले असता मोरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ओम याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे. मोरे यांच्या नातलगांनी आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले तसेच मोरे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला महावितरणमध्ये नोकरी मिळावी, अशी मागणी केली आहे. या घटनेची दखल आमदार किरण सामंत यांनी घेतली असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करा, असे आदेश दिले आहेत. तसेच जखमी ओम मोरेला उपचारासाठी मदत करा, असेही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या घटनेचा साखरपा पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस अधिक तपास करत आहेत.