खेड, दापोली व मंडणगड शहरासह ग्रामीण भागातील दुर्गम भागात वसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व विद्युतीकरण न झालेल्या ५९९ घरांना पंतप्रधान सौभाग्य योजनेतून विनाशुल्क वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती येथील महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे वीज जोडणी झालेल्या कुटुंबांची घरे अनेक वर्षांनी प्रकाशमान झाली आहेत. गेल्या दोन ते तीन दशकांत वीज जोडणीचा वेग वाढून ग्रामीण भागाला फायदा झाला होता. परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल व विद्युतीकरण न झालेल्या शहरातील झोपडपट्ट्यांसह ग्रामीण भागातील दुर्गम भागात वसलेल्या वाड्यावस्त्यांमधील अनेक घरांमध्ये वीज पोहचली नव्हती.
विजेची सुविधा मिळावी, यासाठी पंतप्रधान सौभाग्य योजनेतून सरसकट वीज जोडणी देण्यात आली. प्रत्येक सामान्य कुटुंबांतील घरांना योजनेच्या लाभासह वीज पोहचवण्याचे उद्दिष्ट महावितरण कंपनीला देण्यात आले होते. त्यासाठी केंद्र सरकारने विद्युत रोहित्र, वीज तार व पोल उभे करण्यासाठीची मदत करत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत दिला आहे. महावितरण कंपनीच्या खेड उपविभागीय क्षेत्रातील दापोली परिसर १ मधील ८९ लाभार्थी, दापोली परिसर २ मध्ये १४३, खेड १२५, लोटे १२८ तर मंडणगडमधील ११४ लाभार्थ्यांना फायदा झाला आहे.