26.1 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriकोकणामध्ये अश्मयुगातही मानवाच्या वावराचे पुरावे सापडले

कोकणामध्ये अश्मयुगातही मानवाच्या वावराचे पुरावे सापडले

अश्मयुगात मानवाचा वावर होता याचे पुरावे दगडी हत्याऱ्यांमुळे पुढे आले आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या पुढाकाराने आय आय टी एम प्रवर्तक, आय आय टी मद्रास आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी द्वारा संचालित कोंकणातील कातळशिल्प संशोधन या ‘राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून चालू असलेल्या संशोधनात्मक कामातून दक्षिण कोंकणातील कातळ सड्यांवर अश्मयुगात मानवाचा वावर होता याचे पुरावे दगडी हत्याऱ्यांमुळे पुढे आले आहेत. कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात ही खूप मोठी आणि महत्वपूर्ण उपलब्धी आहे. तसेच दक्षिण कोंकणात आढळून येत असलेल्या कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी देखील हे महत्वपूर्ण पुरावे आहेत.

गेल्या १० / १२ वर्षात रत्नागिरी मधील सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेन्द्र ठाकूरदेसाई ह्या मंडळीनी आपल्या अखंड मेहनतीतून कातळशिल्प रूपी जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व असलेला एक अनोखा वारसा ठेवा जगासमोर आणला आहे. हे कार्य शोधापुरते मर्यादित नसून यावर तेजस गर्गे, संचालक पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने तसेच ऋत्विज आपटे, पुरातत्व अभ्यासक आणि विविध ज्ञान शाखेतील तज्ञ मंडळींच्या साथीने अधिक सखोल संशोधनात्मक काम चालू आहे. या कामाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांची जोड मिळाली असून आय आय टी एम प्रवर्तक, आय आय टी मद्रास ही भारतातील एक अग्रगण्य संस्था या कामात सहभागी झाली आहे.

या सर्वांच्या सहकार्याने कोंकणातील कातळशिल्प या विषयावर सर्वांगीण ‘कातळशिल्प संशोधन’ संशोधन चालू झाले आहे. या संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्वीय सर्वे क्षण. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या पूर्वपरवानगीने हे पुरातत्वीय सर्वेक्षण चालू आहे. या सर्वे क्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील काही कातळशिल्प ठिकाणांच्या परिसरात अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली आहेत. पुढील संशोधनात्मक कामासाठी यातील काही नमुने गोळा करून त्यावर शास्त्रीय चाचण्या करण्यात येत आहेत. गेली वर्षभर चालू असलेल्या या संशोधनात्मक कामातून मिळालेली दगडी हत्यारे ही काही मध्यम आकाराची तसेच काही सूक्ष्म आकाराची आहेत: यात प्रामुख्याने तासणी, सूक्ष्म पाती, गाभे, प्रिपेड कोर, छिलके यांचा समावेश आहे.

मिळालेल्या दगडी हत्याऱ्यांचे आकार, बनविण्याची पद्धती यांवरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग या कालखंडातील हे पुढे आले आहे. कोकणात मिळालेली हत्यारे ही आपल्याला ह्याचा अंदाज नक्की देतात की कोकणात मानवी वस्ती अंदाजे किती सालापासून अस्तित्वात होती. मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसविसन पूर्व ४०,००० ते १०,००० ह्या कालखंडातील ही हत्यारे  असावीत. कोकणच्या प्रागैतिहासिक कालखंडाबाबत पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे पुरावे ह्या रूपाने समोर आले आहेत. ह्या कालखंडात राहणाऱ्या माणसानेच ही कातळ खोद चित्र काढली की आणि कोणीतरी ह्याबाबत सद्य स्थितीला काहीही ठोस स्वरूपात सांगणे अवघड आहे.

RELATED ARTICLES

Most Popular