विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बीकेसी एमएमआरडीए मैदानावर घेतलेल्या सभेवर सडकून टीका केली असून ते म्हणाले कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा होती. संपूर्ण भाषण संपेपर्यंत केवळ लाफ्टर सुरू होते, अशी टीका केली आहे.
बीकेसी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीवरील केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ”अयोध्याच्या आंदोलनात तुमचा शिवसेनेचा एकही नेता नव्हता, हे म्हटल्यावर खरच राग आला. ”हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, आणि याचा सार्थ अभिमान आहे मला. १९९२ साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते सहलीला, आम्ही नव्हे.”
फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे काल म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा. लपवायचं काय, आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझं वजन १२८ किलो होत. उद्धव ठाकरे यांना असं वाटत माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार एवढ नक्की, असे ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, हनुमान चालीसा तर आपल्या मनात आहे. मात्र रवी राणा आणि नवनीत राणा हे खूपच नादान आहेत. यांना माहितच नाही हनुमान चालीसामधील दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासून माहित आहे. ते फक्त त्याच दोन ओळींवर काम करत आहेत. काय आहेत या दोन ओळी तर, ‘राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे’ म्हणून फक्त २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाली आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला ५० लाखांची घड्याळही दिली. त्यांची मातोश्री म्हणजे त्यांची आई, नाहीतर तुम्ही चुकीची मातोश्री समजाल, असा खोचक टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.