रत्नागिरी शहर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या दत्तात्रय गोडसे या चोरट्याने हातात बेड्या घालून मुंबई पर्यंत प्रवास कसा केला याचे वर्णन केले. त्याने पुढे सांगितले कि, बेडीसह खिशात हात घालून रिक्षातून रहाटाघर आणि तेथून एसटी बसने चिपळूणपर्यंत प्रवास केला. चिपळूणमध्ये त्याने दगडाने बेडी तोडून मग रेल्वेने तो पुढे कल्याण-मुंबईला गेल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. रेल्वे आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाला चोरट्याला पकडण्यात यश आले; परंतु ती बेडी कोणाची? कुठे टाकली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दत्तात्रय शिवाजी गोडसे रा. सोलापूर असे पळून जाऊन पुन्हा अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गोडसेला रेल्वे पोलिसांनी शनिवारी ता. १२ ला पहाटे पकडले होते. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी घेऊन गेले होते; परंतु १० वाजता रेल्वे पोलिस शहर पोलिस ठाण्यात गेले ते सायंकाळी चार वाजेपर्यंत गोडसेच्या अटके संदर्भात कोणतीही कार्यवाही शहर पोलिस ठाण्याकडून झाली नाही. एवढी दिरंगाई का करण्यात आली, असा संशयित सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे. चार वाजण्याच्या सुमारास गोडसेने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हाती तुरी देऊन तेथून पलायन करत मुंबई गाठले.
या दरम्यान हा चोरटा गोडसे पळाल्यानंतर रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांची एकच धांदल उडाली. त्याला पकडण्यासाठी पळापळ सुरू झाली. रेल्वे आणि शहर पोलिसांची झोप उडाली. अखेर तीन पथके तयार केली आणि काल मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोडसेला कल्याणमधून अटक करण्यात आली.
पलायन केल्यानंतर गोडसेने बेडीसह हात खिशात घातला. त्यामुळे बेडी दिसण्याचा संबंधच आला नाही,ती लपवूनच रिक्षाला हात दाखवून रहाटाघरला गेला. तेथे त्याने एसटी पकडून चिपळूण गाठले. पळाल्यानतंर चिपळूणपर्यंत बेडीचा हात खिशात घालूनच गोडसेने प्रवास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.