सरकारी काम आणि महिनाभर थांब अशी म्हण सर्वज्ञात आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये गेल्यावर, तिथे लागणारा वेळ, तिथल्या अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे एक एक नखरे, शिपायापासून अधिकार्यांपर्यतचे कनेक्शन, म्हणजे कोणतेही सरकारी कार्यालयातील कामे असतील तर निदान पूर्ण एक दोन दिवस हाताशी धरूनच ते करायला बाहेर पडावे लागते.
परंतु, कोरोनामुळे एक तर बरीचशी कामे एक तर ऑनलाईन होऊ लागली आहेत. आत्ता जागा जमिनीच्या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्या वेळेनुसार हेलपाटे घालावे लागत असत ते आत्ता काही प्रमाणात बंद होणार आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या हिताचा विचार करून एका छताखाली सेतू कार्यालयामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
आता सेतू कार्यालयातच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सातबारा प्राप्त होणार आहे. प्रजासत्ताक दिना पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रात ऑनलाइन सातबारा,गाव नमुना ८ आणि ऑनलाईन फेरफार देण्याचे काम सुरू झाले आहे. अशाप्रकारे सेतू केंद्रातून ऑनलाईन सातबारा देणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
सातबारासह अन्य आवश्यक कागदपत्रे कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी महसूल विभागात ऐकायला मिळतात. सातबारा किओस्क हि यंत्रणा असली तरी नेटवर्क आणि अन्य काही मर्यादा त्या यंत्रणेला आहेत. अशावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सातबारा सह जमिनीशी संबंधित महत्वाचे कागदपत्र तातडीने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सर्व सेतू केंद्रात सातबारा, गावनुमना ८ आणि फेरफार देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.