कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने नवे निर्बंध लावले आहेत. यानुसार १० जानेवारीपासून अधिक कठोर निर्बंध लागू होत आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ठरवून त्यानुसार कडक निर्बंध लावण्यात येतील.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोनाच्या विषाणूशी लढत आपण दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता नवीन रुपात आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूपच अधिक आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा करण्याची थांबवून या संसर्गाला लवकरात लवकर आहे तिथेच थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण निर्माण होऊ शकतो.
पण निव्वळ कायदे आणि नियम करून अशा अडचणींचा सामना करू शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातील कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा कोरोनावर अखेरचा घाव करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत ” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“आपल्याला काम बंद करायचे नसून, ज्यामुळे कोरोना पसरत आहे ती गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे” असंही त्यांनी विशेष नमूद केले आहे. मागील २ वर्षे विविध प्रकारे करण्यात आलेले लॉकडाऊन हे तेंव्हा लस उपलबद्ध नव्हती आणि आता लसीकरण करणे हि प्रत्येकाने स्वत:ची मुख्य जबाबदारी असल्याप्रमाणे पूर्ण करून घेणे अत्यावश्यक आहे.