राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षातून एकदा बाप्पा घरी येणार म्हणून प्रत्येक भाविकामध्ये उत्साहाचे वातावरण असते. परंतु, मागील वर्षीपासून अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही साधेपणाने आणि कोरोनाच्या सावटाखालीच साजरा करावा लागणार असल्याने, भाविकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवासाठीची निर्बंधित नियमावली जाहीर केली असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रमुख सार्वजनिक मंडळांशी कोणतीही चर्चा न करताच नियमावली जाहीर केली. यामुळे यंदाही मंडळांना गणेशोत्सव जोशात साजरा करता येणार नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये नाराजी आणि संतापाची संमिश्र लाट निर्माण झाली आहे. यावर्षी सुद्धा सार्वजनिक मंडळाच्या गणपती मूर्तींसाठी उंचीची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात या सार्वजनिक मंडळांनी शासनाला सर्वतोपरी सामाजिक बांधिलकी म्हणून मदत केली. शासनाने मागितलेल्या मदतीला मुख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच पुढे सरसावले, पण तरीही राज्य शासनाने मंडळांचे एकच सांगणे होते कि, नियमावली जाहीर करण्याच्या आधी गणेशोत्सव मंडळाशी किमान बैठक करून मंडळाशी चर्चा करून मत जाणून घ्या. पण तसे काहीही न करता, काहीही ऐकून न घेता मागील वर्षाप्रमाणेच नियमावली आणि निर्बंध निश्चित करण्यात आले. यामुळे निश्चितच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार आणि भाविकगण नाराज झाला आहे. सरकारने घेतलेले निर्णय हे एकतर्फी असल्याने त्याबाबत फेरविचार करावा, अशी विनंती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.