कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी रेल्वेने बिनधास्त यावे कारण त्यांच्यासाठी लागतील तेवढ्या जादा गाड्या सोडण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने केली आहे. आताच गणपती स्पेशल ट्रेनचे बुकींग संपले असून, वेटिंगलिस्ट आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे व वेटिंग लिस्टप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येेथे पत्रकार परिषदेत केली. रेल्वेचे खाजगीकरण आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण होणार नाही, असे दानवे यांनी स्पष्टपणे सांगून अशा चर्चांना पूर्णविराम दिला.
एका कार्यक्रमासाठी येथे आलेल्या रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयाला पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गतवर्षीसुद्धा गणेशोत्सवासाठी रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याप्रमाणेच लागतील तेवढ्या गाड्या सोडू. भाविकांनी व चाकरमान्यांनी गावी कसा येऊ, याचा विचार करू नये. कोकणातून माल वाहतुकीसाठी जादा गाड्यांची मागणी व्हायला हवी आहे. माल वाहतूक हा रेल्वेचा आत्मा आहे. याकरता आम्ही प्रस्तावाची वाट पहात आहोत, आम्ही प्रवासी वाहतूक करतोच, पण मालवाहतुकीतूनही उत्पन्न मिळते.
रेल्वे आरक्षण व तिकीट सवलत अनेक वर्षांपासून बंद असल्याने मराठी पत्रकार परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेने थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागिल काही वर्षांपासून या सवलती पत्रकारांसाठी बंद असल्याने पत्रकारांना प्रवासात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सुविधा पुन्हा देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेकडून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रत्नागिरी दौऱ्यावर असताना सोमवारी देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, किशोर मोरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, मराठी पत्रकार परिषद राज्य संघटक जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, माजी जिल्हा अध्यक्ष हेमंत वणजू, शुभम राऊत, प्रशांत पवार, प्रशांत हरचेकर,सतीश पालकर, सचिव जमीर खलफे, अमोल मोरे, मनोज लेले आदी उपस्थित होते.