प्रथेप्रमाणे शिराळेची गावपळण ग्रामदेवतेचा कौल घेऊन सुरू झाली. सध्या पौष महिना सुरू असून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच देवाने कौल दिल्याने बुधवारी गावकऱ्यांनी गाव साडला आहे. माळनारानावर उभारलेल्या झोपड्यांमध्ये गावकरी रहायला गेले असून पुन्हा देवाचा कौल घेऊनच गावात माघारी फिरणार आहेत. शिराळेची गावपळण सर्वत्र प्रसिद्ध आहे. यामुळे या गावपळणीकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी बाजारपेठेपासून सुमारे १५ किलोमीटर सह्याद्रीचा कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या गांगेश्वर देवाच्या हुकूमाने ही गावपळण रविवारी गांगेश्वराला कौल लाऊन ‘हुकूम घेऊन ग्रामस्थांनी दडोबाच्या उघड्या मळरानावर सोमवारी व मंगळवारी आपल्याला राहण्यासाठी झोपड्या बांधून पूर्ण केल्या व बुधवारी दुपारनंतर ग्रामस्थ गाव सोडून दडोबाच्या पायथ्याशी दाखल झाले.
गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगोदेवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच दिवसांची तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासीय गावात परततात. यावेळी बुधवार पासून गाव पळणीला सुरुवात झाली आहे. शिराळेवासीय गाव पळणी दरम्यान लागणारा धान्यसाठा, जनावरे पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात व सडूरे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी उघड्या माळरानामध्ये झोपडी बांधून वास्तव्य करतात. दरवर्षी पौष महिन्यामध्ये ही गावपळण असते. रविवारी गांगोदेवाला कौल लावून देवाचा हुकूम घेण्यात आला आणि नंतर सडूरे गावाच्या हद्दीत उघड्या रानावर झोपड्या बांधण्यात आल्या आहेत.
गाव पळणीच्या म्हणजे घरातून बाहेर पडण्या अगोदर बुधवारी सकाळी घरामध्ये गोड जेवण किंवा मटण वडे जेवण करून गावकरी गावाबाहेर पडले. गुरूवार हा गाव पळणीचा पहिला दिवस आहे. ज्या दिवशी घरातून बाहेर पडले जाते तो दिवस गृहीत धरला जात नाही कारण घरातील चुलीमध्ये विस्तव (आग) असते. या गावपळणीमध्ये घरातील लहान थोर सर्व सहभागी झाले आहेत. गावपळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा वृक्षांखाली भरवली जाणार आहे. गावात गाव पळणी दरम्यान एसटी बस सुद्धा जात नाही. गाव पळणीला शिराळेवासीय गावाबाहेर निघाले की जनावरे पक्षी घेऊन बाहेर पडतात. दिवसा ही जनावरे सड्ररे हद्दीत सोडून दिलेली असतात पण ती कधीही गावात पळून जात नाहीत. तर संध्याकाळी रात्र पडली की आपल्या मालकाच्या झोपडी जवळ जातात. गावपळणी दरम्यान लगत असणाऱ्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाणी पितात.
तीस ते पस्तीस झोपड्या असून एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या असतात. त्यामुळे दिवस रात्र हे सर्व लोक एकत्र राहतात व गावपळण खेळीमेळीच्या वातावरणात राहून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटणारे असतात. गांगोदेवाने हुकूम दिल्यानंतर दोन दिवसात गावपळण केली जाते. गावपळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कुणीही गावात पाऊल ठेवत नाही कारण या तीन दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे तीन दिवस गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. त्यामुळे पहिले तीन दिवस कोणीही गावात जात नाही. तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा ग्रामस्थ गावात जाऊन आपले घरदार पाहून येतात पण गावात राहत नाहीत. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो त्यानंतर गावभरणी होते.
एकूण गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन पाच सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारा एकमेव गाव आहे. गावभरणी केल्यानंतर काही दिवसात गावातील एका माळरानावर जत्रोस्तव केला जातो. या जत्रोत्सवामध्ये तालुक्यातील इतर गावातील लोक, पाहुणे, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शिराळेवासीयांचा आपल्या गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात परत तीन दिवसानंतर हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गाव सडूरे गावचा महसुली गाव असून सडूरे शिराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. शिराळे गावात ७५ कुटुंब असून सुमारे ३४० लोकसंख्येचा असणारा गाव आहे.

