खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील रासायनीक कंपनीतून सोमवारी सायंकाळी सल्फर डाय ऑक्साईड नामक वायूची गळती झाली. त्यामुळे चाळकेवाडी व तलारेवाडी मधील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाला तसेच परिसरातील झाडेझुडपे, गवत व परसबागेतील भाजीपाला जळून नष्ट झाला अशी माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. वायू गळतीनंतर तलारेवाडी व चाळकेवाडी मधील ग्रामस्थ संतप्त झाले आणि सायंकाळी उशीरा ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडकले. यावेळी लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, चाळकेवाडीचे अध्यक्ष रोहित चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या वायूची गळती झाली असे सांगण्यात आल्याची माहिती सरपंच चंद्रकांत चाळके यांनी पत्रकारांना दिली. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ अशी ग्वाही कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली. मात्र या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांचे यावर समाधान झाले नाही. वारंवार अशा दुर्घटना या कारखान्यात होत असून या दुर्घटनांबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील गांभीर्याने घेतलेले नाही असा गावकऱ्यांचा दावा आहे.
हे प्रकार न थांबल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील आणि ते आंदोलन कारखान बंद होईपर्यंत चालू राहिल असे सरपंच चंद्रकांत चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान या विषयी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.