राज्यातील रस्त्यावर वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र वेगमर्यादेचा अधिनियम धाब्यावर बसवून वाहनधारक वाहने चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवळी येथील गॅसवाहू टँकर हे त्याचे उदाहरण आहे. अवजड, मालवाहू वाहनांना समतर रस्त्यावर ताशी ८० तर घाटभागात ताशी ४० किमीप्रमाणे वेगमर्यादा घालून दिली आहे; परंतु निवळीतील अपघातामध्ये त्याचा वेग ताशी ६० ते ७० असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगमर्यादवर कोणताही अंकूश नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियमावर बोट ठेवून अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवल्यास अनेक अपघात टळतील, असे अभ्यासकांचे मत आहे. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी मोटारवाहन अधिनियम १९८८चे कलम ११२ मधील तरतुदीनुसार राज्यातील रस्त्यावर वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा निश्चित केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्तेसुरक्षा यांनी रस्ते अपघात आणि यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी १० टक्के घट करण्याच्यादृष्टीने आदेश दिले आहेत. राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सुमारे ३० टक्के अपघात हे वाहनचालक यांनी भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे होतात. राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाटरस्ते, वळणरस्ते, समतल रस्ते आणि रस्त्यातील चढ-उतार आदींचा सांगोपांग विचार करण्यात आला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहनांच्या वर्गानुसार वेगमार्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रस्त्यासाठी वाहनांच्या वर्गानुसार वेगमर्यादा निश्चित केली आहे. या अधिनियमानुसार, निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा ५ टक्के अधिक वेग आढळून आल्यास वाहन अधिनियम अन्वये दखल घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे; परंतु त्यापेक्षा जास्त आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.