महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वेस्थानक जगातील चांगली रेल्वेस्थानके करू, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. तसेच रोजगारासाठी कोकण रेल्वेने स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही केली. रत्नागिरी रेल्वेस्थानकात वातानुकूलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते काल (ता. ३०) करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, माजी आमदार संजय कदम, कार्ययोजना आणि वाणिज्य संचालक सुनिलकुमार गुप्ता, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, उपसरपंच अशोक विचारे, सचिन वहाळकर, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीचे रेल्वेस्थानक विमानतळापेक्षा सुंदर बनले आहे.
एमआयडीसीने ४० कोटी दिले आहेत. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही निधी दिला आहे. प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा होत आहेत. मात्र, सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. आणखी पाच-दहा कोटी निधी लागला तरीही एमआयडीसीमार्फत दिला जाईल. पण, मुंबई विमानतळापेक्षाही रेल्वेस्थानके चांगली व्हायला हवीतः स्वच्छ सुंदर झालेल्या रेल्वेस्थानकांवर कोकण रेल्वेने रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे. केवळ चांगली रेल्वेस्थानके बनवत नसून रोजगारही उपलब्ध करून दिला जातोय, असा संदेश जायला हवा. पन्हं, कोकम, वाळा सरबत, मोदक अशा कोकणी पदार्थांना आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठीही कोकण रेल्वेने पुढाकार घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी श्री. झा यांनी विमानतळासारखी वातानुकूलित सुविधा प्रतितास ५० रुपयांत या विशेष अतिथी कक्षात देण्यात येणार असल्याचे सांगितले.
लोककला गीतावर समई नृत्य – रत्नागिरी येथील कलासार्थ समूहाच्या गौरी साबळे, राणी धनावडे, वैष्णवी साळवी, मधुरा कांबळे, ऋता तोडणकर, आस्था खेडकर, रोहित शिंदे, हृतिक कदम व विनीत सनगरे कलाकारांनी “देवली माथ्यारती ठेयल्यान, देवली माथ्यारती ठेयल्यान” या कोकणी लोककला गीतावर समई घेवून अतिशय सुंदर नृत्य केले.