रत्नागिरी जिल्हयातील गुहागर तालुक्यातील मौजे अंजनवेल येथून दोन महिलांबरोबर तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. या तीन अल्पवयीन मुलींसह दोन महिलांना १२ तासात शोधण्यास रत्नागिरी गुहागर पोलीसांना यश आले. पोलिसांनी या सर्वांना मुंबई येथून ताब्यात घेतले असून या अल्पवयीन मुली व महिला सुखरुप आहेत.
घडलेली घटना अशी कि, शुक्रवारी गुहागर तालुक्यातील अरमारकर मोहल्ला, अंजनवेल येथील राहणारी गजाला फैयाज महालदार यांच्या ३ अल्पवयीन वय १७ वर्षे, १३ वर्षे, ११ वर्षेच्या मुलींना मोहल्यात राहणाऱ्या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी यांनी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आम्ही अंजनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर गजाला यांच्या ३ मुलींना सोबत घेवून त्या गेल्या. मात्र तिनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात इतरत्र शोध घेण्यात आला. तर त्या परत न आल्याचे समजले.
तसेच, डॉक्टरांकडेही चौकशी केली. तेव्हा महिला व मुली हॉस्पीटलमध्ये गेल्या नसल्याचे समोर आले. गजाला महालदार यांनी रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहून आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने त्या दोन्ही महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होणे कठीण बनले होते.
अखेर याबाबत गुहागर पोलिसांना माहिती प्राप्त मिळताच या घटनेत एकूण ७ बालक व २ महिला बेपत्ता असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली व चिपळूणचे उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या सुचनेप्रमाणे शोध घेण्यासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व ८ अमंलदार यांची ४ टीम तयार करण्यात आली. घटनेच्या गांभीर्याप्रमाणे क्षणाचा विलंब न करता सविस्तर तपासाला सुरुवात झाली. अखेर गुहागर पोलीसांनी दोन्ही महिला व ७ बालकाना दादर मुंबई येथून सुखरुपरित्या ताब्यात घेतले.